Friday, 7 March 2025

ती...

                   


          तिने वावरात लावलेला लसणाचा वाफा आता बराच फुलला होता. परवा माणसं लावून शेतातली तूर काढून घरी पोती आणली ती पाहून सगळ्यांची मनं गलबलली. हे पीक किती मेहनतीने जपलं होतं तिनं. बाजूलाच मागच्या हंगामाची तूरही पडून होती..मी बरी झाले की तूर भरडून डाळ करायचीय..शेवटच्या दिवसांतही तिच्या डोक्यात हा विचार होता.या वर्षी शेतात विहीर खणली..तशी तिची उमेद अजून वाढली होती. आता यंदा पीक व्यवस्थित आलं की छोटं का होईना घर नीट बांधू.. पत्र्याच्या  घरात नाही काढायचा पुढचा उन्हाळा..तिने ठरवलेलं. पण उन्हाळ्याआधीच होत्याचं नव्हतं झालं. परिस्थितीशी लढली पण आजाराशी झुंजायला  नियतीनं वेळच दिला नाही.

               पुरुषाचं जाणं आणि एका बाईचं जाणं त्यातही..तरुण कर्त्या बाईचं जाणं यात खूप फरक असतो. ती जग सोडून जाते तेव्हा कुठे कुठे अस्तित्व ठेवून जाते.. नाही ? कष्टाने फुलवलेलं रान, लहानसं पण पसारा नीट आवरलेलं घर..कपाटात रचून ठेवलेल्या मोजक्या साड्या, अंगणातली तुळस, स्वयंपाकघरातली भांडी..अन अश्रू गोठून गेलेल्या डोळ्यांनी भिरभिर पाहणारे मुलांचे चेहरे...कुठे कुठे शोधायचं..कुठे कुठे आठवायचं? सगळीकडं तिनं आपलं मन गुंतवलेलं असतं. सगळीकडे तिच्या आठवणी आहेत. आणि जो जो इथे बघतो त्याला प्रत्येक गोष्ट अधुरी वाटते. खुद्द तिलाही शेवटच्या क्षणापर्यंत हे  वाटत राहिलं- हे राहिलं, ते राहिलं, ते साफ करायचं होतं, हे बनवायचं होतं....हे तिच्या तोंडून ऐकून तिच्या म्हाताऱ्या आईच्या मनात खोल खड्डा पडत होता. बाईनं स्वतःभोवतीचे पाश स्वखुशीने इतके आपलेसे केलेले असतात की नियतीनं ते सोडवले तरी त्याच्या खुणा धूसर व्हायला खूप वेळ जावा लागतो.

         तिचा मुलगा यंदा बारावीला , अन लहान मुलगी सातवीत. मी आईच्या दशक्रिया विधीला गेलो नाही तर काही होईल का ? तिच्या मनात काही इच्छा असेल तर ? मी जायला हवं..पण बोर्डाचा पेपर..वर्षभराचा अभ्यास. काय करू ? मुलाच्या मनात द्वंद्व सुरु होतं. तेवढ्यात तिचे शब्द आठवले.  "माझा दादा कॉलेजला जायला लागला..सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, घेणं झाला नाही, पण आता घे. छोटी दिदी आणि तू व्यवस्थित रहा, नीट अभ्यास कर आणि शेताकडे पण लक्ष दे." मुलाच्या मनात आईचे शब्द घुमत होते. तसा तो मनाशी काहीतरी ठरवून बोलला - "मी देणार पेपर." नातेवाईक , आप्त-स्वकीय सांत्वन करतात ते महत्वाचं असतंच.  पण जेव्हा नॉर्मल रोजचं आयुष्य तिच्याविना सुरु होतं तेव्हा त्या आईने लेकरांच्या डोळ्यात पेरलेली स्वप्नंच कदाचित त्यांना पुन्हा नव्याने उभी करत असतात. सुरुवातीला छळणाऱ्या आठवणी जपूनच कदाचित जगण्याचं बळ येतं.  

          आज एक महिना झाला. घर हळूहळू सावरायचा प्रयत्न करत आहे. बहिणाबाई एका कवितेत सांगून गेल्यात ना.. एक सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरच्या आठवणीत भावुक होवून माहेराबद्दल सांगते तेव्हा साधुबुवा विचारतात - तुला  इतकी आठवण येतेय माहेरची तर का राहतेस सासरी ? जा ना माहेरी. तेव्हा ही सासुरवाशीण सांगते - 

"देरे देरे योग्या ध्यान,  ऐक काय मी सांगते 

लेकीच्या माहेरासाठी , माय सासरी नांदते "  

आज दिदीने तिच्या बाबांना स्वयंपाकात मदत केली. तुम्ही भाजी करत जा, पोळ्या येतात मला, भाकरी पण शिकवलीये मला आईने, जमेल सगळं." ती आत्मविश्वासाने बोलली. भिंतीवर अडकवलेल्या फोटोत आपल्या स्वर्गीय पत्नीच्या आणि घराची जबाबदारी सांभाळू पाहणाऱ्या लेकीच्या डोळ्यांत एकच चमक तिच्या बाबाने अनुभवली. आणि बऱ्याच दिवसांनी त्याला बरं वाटलं.

 -©अमिता

  #Women'sDay

#internationalwomensday

  8th March 2025                                                                                                                            

  PC - google.

Note - वावर - शेत

                                          





Thursday, 12 December 2024

    काल पहिल्यांदा अशी एक आत्महत्येची केस खुद्द त्याच व्यक्तीच्या तोंडून  ऐकली जिने अक्षरशः रडवलं. मूळच्या उत्तर प्रदेशातल्या आणि सध्या बंगळुरूच्या एका  IT  कंपनीत चांगल्या पदावर काम करणाऱ्या एका हुशार इंजिनिअर 'अतुल सुभाष ' यांनी पत्नीने काही वर्षांपासून टाकलेल्या खोट्या केसेस मध्ये न्याय मिळत नाही असं पाहून असह्य होऊन आपलं जीवन संपवलं..ही बातमी तुम्ही ऐकलीच असेल. 

          जाण्याआधी या व्यक्तीने लग्नापासून ते आजपर्यंत नेमकं काय घडलं, हे पुराव्यांनिशी सांगून सगळे पुरावे लिखित आणि ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात दिले आहेत. या शेवटच्या व्हिडिओत आपल्यावर गुजरलेली ही कहाणी सांगतानाही हा माणूस खूप शांत, संयत आणि शालीनतेने बोलताना दिसतोय, आणि तेही डोळ्यात एकही अश्रू  न दाखवता. पण प्रत्येक शब्दातली वेदना आपल्याला जाणवते, आणि खरंच आपल्या न्यायव्यवस्थेची लाज वाटते.  महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी म्हणून कडक कायदे तर केले गेले जे बऱ्यापैकी महिलांच्या बाजूने जास्त आहेत. पण गेल्या काही वर्षांत या कायद्यांचा दुरुपयोग शस्त्रासारखा करून पुरुषांवर खोट्या केसेस करणाऱ्या महिलाही आहेत - हे मी एक महिला असूनही सांगते आणि आता या कायद्यांमध्ये (amendments)  योग्य त्या सुधारणा करण्याची गरज आहे असं माझं मत आहे . खरं तर हे खूप आधीच व्हायला  हवं होतं. महिला आयोग काय तत्परतेने काम करतो न करतो हा विषय बाजूला ठेवूया , पण महिला आयोग किमान अस्तित्वात आहे. पण पुरुषांसाठी असा आयोग नाही , त्यामुळे अन्याय सहन करून पण  दाद कुठे मागावी हे माहित नसल्याने अशा पीडित पुरुषांचा आवाज हा विखुरलेला आहे आणि अशा केसेस मध्ये वाट्याला आलेली बदनामी, आर्थिक नुकसान आणि तरीही न्यायाच्या प्रतीक्षेत जीवन कंठण्याची वेळ बऱ्याच पुरुषांवर आहे जी चांगली गोष्ट नाही.  सदर व्यक्तीच्या पत्नीने कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्यासाठी (केसेस मागे घेण्यासाठी ) तीन करोड रुपयांची मागणी केली होती, आणि शिवाय मुलाच्या पालन-पोषणासाठी महिन्याला मिळणारे ४० हजार ८० हजारापर्यंत किंवा अजून वाढवण्याची ही मागणी होती, एक- दोन नव्हे वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल होते, आणि केसच्या सुनावण्यांसाठी कामाच्या ठिकाणाहून  दुसऱ्या राज्यात जाणे- येणे, त्यात सतत मिळणाऱ्या नवीन नवीन तारखा आणि भ्रष्ट न्यायव्यवस्था या सगळ्याला कंटाळून अतुल यांनी हे पाऊल उचललं. व्हिडिओमध्ये शेवटी काही इच्छा व्यक्त केल्या आहेत. मला न्याय मिळत नाही तोवर अस्थीविसर्जन केलं जाऊ नये,  "और जस्टिस नही मिला तो कोर्ट के सामनेवाले गटर में मेरी अस्थिया बहा देना जिससे पता चले कि इस देश में एक जिंदगी की क्या व्हॅल्यू है.." हे वाक्य  आणि मी गेल्यानंतर ही लूटमार बंद होईल आणि आई-वडिलांना तरी नीट जगता येईल असं म्हणून , त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी असताना मी जातोय म्हणून सॉरी  हे बोलणं आपलं  काळीज चिरतं. न्यायवावस्थेने तारीख पे तारीख कल्चर सोडून ठराविक वेळेत केसेस निकाली लावल्या तर किती बरं होईल. ही मोठी प्रोसेस एक प्रकारे मोठी शिक्षाच आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण आपल्याकडे का प्रचलित झाली याचं कारणच हे आहे. 

      हे सगळं करणारी महिला ऍक्सेंचर या नामांकित कंपनीची एम्प्लॉयी आहे. यावरून एक गोष्ट कळते की फक्त शिक्षण नव्हे, तुमच्यातलं माणूसपण आणि मूल्ये (values) जपणारं शिक्षण/संस्कार हेच खरं आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर या पातळीपर्यंत कुणावर अन्याय करणार नाहीत. हे सगळं घडत असताना याशी संबंध नसलेली गोष्ट डोक्यात सारखी येते. कुठलंही जोडपं विभक्त होताना पाहणं ही गोष्ट मुळात आवडत नाही .  काही काळापूर्वी एका उत्तम दाक्षिणात्य अभिनेत्रीने पतीपासून वेगळं होताना पोटगी नाकारली. "आम्ही प्रेमामुळे एकत्र होतो. तेच राहिलं नाही तर मी पैशांचं काय करू ?" हे तिचं म्हणणं मला पटलं आणि स्वाभिमानाचं वाटलं. अर्थात सर्वांनी असं करण्याची क्षमता इतर महिलांचीही असेल असं नाही पण किमान कायद्याच्या तरतुदीप्रमाणे सगळं होईल ते बदलण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नये.  

      अजून एक गोष्ट म्हणजे generalization थांबवायला हवं. प्रत्येक तक्रारदार महिला खोटी नसते , ना प्रत्येक पुरुष. या वृत्ती दोन्हीकडेही असू शकतात. अन्याय कुणावरही होऊ शकतो. म्हणून कायद्याने biased/ पक्षपाती राहू नये यासाठी या सुधारणा/ बदल आवश्यक आहेत. हे बदल आणि केसेस निकाली काढण्याची गती या दोन्ही सुधारणाच न्यायव्यवस्थेला न्यायव्यवस्था म्हणणे सार्थ ठरवतील. काय खरं, काय खोटं हे तपासणं यंत्रणांचं काम असलं तरी ते नीट करावं आणि न्याय मिळावा , स्त्री किंवा पुरुष - असा दुरुपयोग करणाऱ्या कुणालाही योग्य शिक्षा मिळावी यासाठी आपण बोलणं गरजेचं आहे.

#JusticeForAtul 

Reference - Atul Subhash Last Video: अतुल सुभाष का अंतिम वीडियो | Bengaluru techie Atul Subhash | Latest News

  

         

Monday, 23 September 2024

शंभू.. कैलासीचा राजा...

            


     रेवलकरवाडी...सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव. माझ्या सासूबाईंचं माहेर आणि अभिजीतचं (अहोंचं) आजोळ. आमच्या लग्नानंतर एक-दोनदा धावती भेट झाली या गावाला पण यावेळी निवांत राहता आलं. गावात काळूबाईचं एक मंदिर आहे, जिथे यात्रेला गर्दी असते. मनात मराठवाडा-खान्देश घेऊन आलेल्या आपल्या बायकोला आपल्या भागात (पश्चिम महाराष्ट्रात )तिला ओळखीच्या, आपल्या वाटतील अशा गोष्टी, असे परिसर दाखवण्यासाठी पतीदेव कायम प्रयत्नात असतात. तुला पुढच्या वेळी रामाच्या डोंगरावर नक्की नेणार..तिथं शंकराचं मंदिर आहे.तुला नक्की आवडेल..हे वाक्य मी त्यांच्याकडून काही महिन्यांपासून ऐकत होते. अनंत रूपांमध्ये एकच देव वसतो असं सगळ्याच आस्तिकांना वाटतं. पण तरीही आपण एखाद्या रूपाच्या जास्त प्रेमात असतो. श्रीकृष्णाच्या मंदिरात भावतो तो शृंगार..एकीकडे गीतेच्या  खोल ज्ञानाबरोबर दुसरीकडे  बासरी, मोरपीस, खेळ, या गोष्टी मनाला मोहून घेतात. तशी मला कुठल्याही शिवमंदिरात असलेली शांतता भयाण शांतता नव्हे..चित्ताला खूप सुखद शांतता देणारी अनुभूती (आजच्या भाषेत म्हणूयात- vibe ) खूप आवडते.  आणि तिथे असलेला एक नैसर्गिक साधेपणा..शंकराच्या आवडीच्या फुला-पानांमध्येही हा  झळकतो.गढूळ पाण्यात तुरटी  फिरवल्यावर  सगळा गाळ तळाशी जाऊन नितळ पाणी दिसावं तसं  मनातली सैरभैर आंदोलनं तळाशी जाऊन स्थिरतेकडे मन आपोआप झुकलं जातं. 

         ठरल्याप्रमाणे आम्ही गावातून मंदिरात जाण्यासाठी निघालो. गावातून दोनेक किलोमीटरचं अंतर. बाईकवर निघालो खरे पण मधेमधे थांबत..निसर्ग न्याहाळत, फोटो काढत वर जात होतो. रस्त्याची वळणं, चढ आणि खड्डे पाहता पायी जाणं उत्तम वाटलं. काही ठिकाणी उभे राहून एका दृष्टीक्षेपात दिसणारं गाव, तळं, पावसाने हिरवे झालेले डोंगर आणि त्यावर ऐटीत उभ्या असलेल्या अनेक पवनचक्क्या.. एकेक गोष्ट बघत बघत पुढे चाललो होतो. आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो त्याचं नाव- रामेश्वर.स्थानिक लोक या जागेचा उल्लेख रामावर, रामाच्या डोंगरावर असा करतात त्यामुळे हे  राममंदिर आहे की काय असं मला पूर्वी वाटलं होतं. भगवान शिव आणि  श्रीराम हे परस्परांचे पूजक आहेत, एकमेकांचं स्मरण करतात.दक्षिण भारतात रामेश्वरम मंदिर आहे - जिथे लंकेत जाण्याआधी प्रभू श्रीरामांनी शिवलिंग स्थापून पूजा केली होती. रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर. तशीच काहीशी आख्यायिका इथली आहे. हेही शिवमंदिर आहे. फरक हा की वनवास काळात इथेही थोडा काळ श्रीरामांचे वास्तव्य होते आणि हे मंदिर स्वयंभू आहे असं सर्वांनी सांगितलं. 

      मंदिर जवळ आलं तसं लांबून दिसणाऱ्या पवनचक्क्या आता मोठ्या दिसू लागल्या. आवारात हिरवाई,अनेक झाडं. पारिजातकाच्या फुलांचा छान सडा पडला होता. काही फुलं ओंजळीत घेऊन  आम्ही मंदिरात प्रवेश केला. मुख्य गाभारा आणि प्रवेश करताच दिसलेली खोलीवजा जागा यात बरंच अंतर आहे.बाहेर दोन मोठ्या आकाराच्या नंदीमहाराजांच्या मूर्ती आहेत. उजव्या हाताला  दगडी आणि कायमस्वरूपी बांधलेलेच ५ सहाण खूप लक्षवेधी आहेत. आणि प्रत्येक सहाणेवर मोठ्या आकाराचं चंदनाचं लाकूडही ठेवलं होतं. सहाण सपाट नसून त्याला मध्ये थोडी खोलगट जागा होती ज्यात पाणीही होतं. थोडंसं चंदन उगाळून कपाळी लावताना लक्षात आलं की इथे बऱ्याच लोकांनी भेट म्हणून दिलेले बरेच आरसे सगळ्या भिंतींवर लावलेले होते. डाव्या बाजूच्या भिंतीवर श्रीरामांचा एक फोटो होता. मी त्या सहाणांजवळ घुटमळत असताना एक आवाज आला - "कोणत्या गावचं तुम्ही ?" पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी घातलेली एक सावळी मूर्ती- हसत विचारत होती. या आजोबांना डोळ्यांनी कमी दिसत होतं, आणि मोठया आवाजात दिलेली उत्तरच ऐकू येत होती. जवळ येऊन संवाद साधताना त्यांनी हातातला मोबाईल पाहिला. मला म्हणाले - याच्यात रेकॉर्ड होतं ना ? म्हटलं - "हो !" "मी अभंग म्हणतो ..याच्यात रेकॉर्ड करता का ? मला चांगलं गाता येतं. " डोळे बारीक करत प्रश्नार्थक नजरेने ते उत्तराची वाट बघत होते. त्यांचा उत्साह बघून आपसूक हो आलं ओठांवर.  "हो , हो , का नाही ? लगेच करूया. आधी आम्ही दर्शन घेऊन येतो ". मी उत्तरले. 

       सकाळची वेळ होती. श्रावण महिना, सोमवार आणि ठराविक सण यातलं काहीच नसल्याने  मंदिरात गर्दी नव्हती. आता आम्ही दुसऱ्या खोलीच्या दिशेने गेलो ज्या पुढे मुख्य गाभारा होता.  गाभारा आणि आतली खोली यात एक पायरी होती. इथे स्त्रिया गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतात. पण आतल्या खोलीपर्यंत प्रवेश सर्वांसाठी सारखाच आहे. वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिरात पुरुषांना गर्भगृहात जाताना शर्ट, चामड्याच्या वस्तू काढाव्या लागतात तोच नियम इथेही नमूद केलेला होता. गाभाऱ्याच्या बाहेरूनही  शिवलिंग एकदम व्यवस्थित बघता येत होतं - फार उंच नसलेलं आणि दगडी , खालचा भाग धातूचा.   जमिनीवर/ फरशीवर छान गारवा होता. आणि उच्चारलेलल्या  शब्दांचा आवाज चांगलाच घुमत होता. 

     दर्शन करून पुन्हा बाहेरच्या मोकळ्या जागेत आलो. आजोबा आपली टोपी- कपडे नीटनेटके करून मांडी घालून बसले. कॅमेरा सुरु होताच त्यांनी एक आलाप घेतली..चेहऱ्यावर एक छान स्माईल. "हे कॅच होतंय का ?" असं माईक टेस्ट करतात तसं त्यांनी व्हिडिओ-ऑडिओ टेस्ट करून खात्री केली. " बाळकृष्ण रामचंद्र गुरव, रामेश्वर" अशी स्वतःची ओळख करून देत अभंग गायला सुरुवात केली - 

                                          "शंभू कैलासीचा राजा, 

                                           त्यासी दंडवत माझा.."  

       चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि गायनात भाव होता. गायकीपेक्षाही देव भावाचा भुकेला. नाही का ? गुरव कुटुंब बऱ्याच वर्षांपासून मंदिराच्या आवारातच राहतं. त्यांचं घरही दिसत होतं. पुन्हा त्याच उत्साहाने  त्यांनी रेकॉर्डिंग बघितलं आणि  सांगू लागले- तरुणपणी खूप गायचो आता वयोमानानुसार कमी..पण मला आवड आहे. नंतर ते त्यांच्या कामाला निघून गेले.

       परत फिरताना पुन्हा गाभाऱ्याजवळ जावं वाटलं (आतल्या खोलीत). आवाज घुमल्यानंतर पुन्हा मिळणारी ती शांतता इतकी हवीहवीशी होती की एका ओंकाराने समाधान झालं नाही. असं वाटलं - इथेच बसून रहावं. मानला तर देव सगळीकडे असतोच पण अभ्यासिकेत गेल्यावर जसं अभ्यासासाठी पूरक वातावरण अगोदरच निर्माण केलेलं असतं तसंच मंदिर परिसराचं असतं हे मला इथे जास्त पटलं. अजून काही मिनिटं ओंकार गुंजन करून बाहेर पडलो. 

      बाहेर येण्याच्या दरवाजासमोर अजून मोकळी जागा होती. तिथे तुळशीवृंदावन आणि त्या शेजारीच एक खूप छोटी, एक मोठी खूपच सुंदर दगडी पिंड- नंदीसहित, आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती. त्यावर वाहिलेली पांढरी फुलं कोवळ्या उन्हात अजून खुलून दिसत होती. इथेही जीव घुटमळत होता. मंदिराभोवती पुढे एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या बऱ्याच झाडांखाली छोटी छोटी शिवलिंगं होती. जरा पुढे गेल्यावर एक वेगळी मूर्ती आहे - रंभाजीची. या रंभाजीची एक दंतकथा इथं सांगितली जाते. रंभाजी या सेवकाकडे सूर्योदय होण्यापूर्वी मंदिरात कावडीने पाणी आणून देण्याची जबाबदारी होती. हा त्याचा नित्यनेम होता. पण एक दिवस कावड आणता आणता उशीर झाला आणि सूर्याची किरणं त्याच्यावर पडली आणि त्याचा पुतळा झाला. ही दगडी मूर्ती इथे बघायला मिळते ज्यात कावड सुद्धा दिसते. खरंच या कारणामुळे की फक्त रंभाजीच्या कामाची स्मृती म्हणून इथे ही मूर्ती आहे माहीत नाही.

     सुट्ट्यांमध्ये इथे आलो की हमखास इथे येणं, बाहेरच्या हिरवळीत  बसून जेवण करणं, खेळणं हे ठरलेलं असायचं- अभिजीत एकेक आठवण सांगत होते. " मग, कसं वाटलं ? काही साम्य वाटलं की नाही इथे आणि तुमच्या गावी ?" माझ्या मंदिर आणि या गावच्या एकूण अनुभवाबद्दल ते विचारत होते. आणि तेही शाहरुखच्या ' ऐसा देस है मेरा हो.. जैसा देस है तेरा... ' या ओळी ऐकवत. (या बऱ्यापैकी अरसिक माणसाला तिथे योग्य गाण्याच्या ओळी आठवणं ही सुद्धा त्या हवेची जादू !असो. 😊 )  

         उत्तर अर्थातच होकारार्थी होतं. वेगळा प्रदेश, थोड्या वेगळ्या पद्धती, वेगळी बोली असली तरी माणसं आणि भावभावना त्याच. माणुसकी, काळजाजवळच्या गोष्टी आणि तेच भाव गवसले की बरं वाटतं. आणि खूप वेगळ्या, नवीन गोष्टी माहितीही होतात. आणि हीच तर आपल्या भारत देशाची खासियत आहे ,सुंदरता आहे. हे साम्य आणि ही भिन्नता नेहमी एन्जॉय करता यावी हीच आशा !

                                                                                   -©अमिता 


Note -

[ठिकाण - रामेश्वर मंदिर, रेवलकरवाडी

तालुका - खटाव , जिल्हा -सातारा , महाराष्ट्र ]


अभंग -

शंभू कैलासीचा राजा  !!२!!

त्यासी  दंडवत माझा !!२!!


गिरीजा शोभे मांडीवरी !!२!!

गंगा वागवितो शिरी !!२!!

अंगी भस्मा चे लेपण  !!२!!

कंठी रुद्राक्ष भूषण !!२!! त्यासी 


व्यग्र गडासनी बैसला !!२!! 

तुका म्हणे वंदू त्याला!!२!! त्यासी

शंभू कैलासीचा राजा   !!२!!

त्यासी  दंडवत माझा !!२!!































   




















 


रंभाजी 









































Tuesday, 18 June 2024

झरोका...

         


      एक नेहमीची सकाळ. स्वयंपाकघरातलं काम उरकून ती वरच्या खोलीत आली. वर्क फ्रॉम होम म्हणजे तेच घर..तेच ऑफिस.  कामाच्या तासांमध्ये ऑफिससारखं वातावरण घरी टिकवून ठेवलं तर कामं व्यवस्थित होतात. अजून लॉगिन करायला बराच वेळ होता म्हणून आधी सगळी साफ-सफाई करूया असं मनाशी ठरवून तिनं हातात झाडू घेतला. दोन खोल्यांमध्ये झाडू मारला. समोरच्या मोकळ्या जागेत झाडू मारून , कुंड्यांमधल्या रोपांना पाणी घातलं. मागच्या खोलीत जाऊन झाडून घेऊ ? तिनं स्वतःलाच एकदा विचारलं. कुठलीही नवविवाहिता सासरी रुळताना आणि कदाचित त्यानंतरही असे प्रश्न स्वतःला विचारूनच कृती करते .  

      मागची खोली जिजींची - तिच्या आजे-सासूबाईंची.. इतर वेळी कुटुंबासोबत असल्या तरी दिवसभर आराम करण्यासाठी त्या याच खोलीत असतात. प्रत्येक मुलाकडे आणि मुलींकडे त्या ठराविक काळ राहून हवापालट करतात हे तिनं ऐकलं होतं. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट तशी लग्नानंतरच झाली. म्हणून सासूबाईंसारखा प्रत्यक्ष संवाद आजे-सासूबाईंशी अजून नव्हता. त्यात वयोमानानुसार आणि कदाचित स्वभावानुसार त्याही मोजक्याच बोलतात असं तिला जाणवलं होतं. 

        आतापर्यंत तिने तुलनेत बोलक्या आज्या अनुभवल्या होत्या. मामाच्या गावी गेलं की लगेच तोंडावरून हात फिरवणारी "आली माझी चिमणी.." म्हणत कपाळावर मुका घेणारी आजी. ऑफिसचे कॉल आणि काम चालू असताना कौतुकानं पाहणारी आणि नंतर प्रश्न विचारणारी आजी. फावल्या वेळेत जात्यावरच्या ओव्या म्हणत बसणारी आजी. या आजींशी मात्र आतापर्यंत काही प्रसंगी आशीर्वादासाठी पाया पडताना ,जेवताना काय हवं- नको विचारतानाच बोलणं झालं होतं. यांच्याशी माझा संवाद कधी होईल  का ? आणि तो व्हावा म्हणून मी काय बोलू ? कुठून सुरुवात करू ? तिला समजत नव्हतं. नव्या वातावरणात- नवीन माणसांत मिसळताना सुरुवातीला काही झरोके असे बंद असतात. काहीतरी निमित्ताने ते उघडले जातात ना तेव्हा संवाद सुरु होतो..लय सापडली तर तो खुलतो आणि मग माणसांची सवय होते.

           काय करू... म्हणत म्हणत ती त्यांच्या खोलीत झाडू घेऊन पोचली.काही न बोलताच तिनं कचरा काढायला सुरुवात केली. आजी आपल्याकडे  बघत आहेत हे मात्र तिला दिसत होतं. खाली अंथरलेली चटई तिनं उचलताच आजींनी ती हातात घेऊन नीट ठेवली. हातासरशी फरशी पुसूनच घेते असं ठरवत ती पुन्हा तिच्या खोलीत गेली. बादलीत पाणी आणि फडकं घेऊन सज्ज झाली. आयत्या झाडूपेक्षा (मॉप) छोटे-छोटे काने-कोपरे पुसायला कधी-कधी फडकं बरं. तर आता सुरुवात आजींच्या खोलीपासून करावी म्हणून ती पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. हातातली बादली बघून त्या म्हणाल्या - परवाच पुसली होती मी. "असू द्या..मी बाकीचं सगळं करतेय स्वच्छ. म्हणून इथे पण घेते पुसून" म्हणत ती कामाला लागली. पाण्याचा तांब्या, बामची बाटली, छोटं स्कार्फ, मिश्रीचा डबा..एकेक गोष्ट बाजूला करत ती पटापटा हात फिरवत होती. "आजी, करमतं का तुम्हाला इथं ? " तिनं मध्येच विचारलं. "करमतं ..न करमून कुणाला सांगते ?" तीन ठिकाणी तीन लेक. सगळ्यांकडे राहते. "गावाला जास्त करमत असेल ना ? " "हा..तिथंच आयुष्य गेलं..तिकडं चांगलंच वाटतं. बोलायला माणसं असतात. ऊन केवढं आहे..वाईच हवेला बसलं की बरं वाटतंय" वगैरे.. त्या बोलत होत्या ..ती ऐकत होती. बहुतेक आजी - आजोबांना शहरात सगळ्या सुविधा असूनही कोंडल्यासारखं वाटतं. यात आपण एक करू शकतो ते म्हणजे त्यांच्याशी संवाद साधून , शक्य त्या गोष्टींत त्यांना सामील करून त्यांच्या मनात  एकटं पडल्याची भावना येऊ नये यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि जेव्हा जमेल तेव्हा गावी राहणं, मुळांशी जोडून राहणंही महत्वाचं. घरातली माणसं समाधानी दिसली की घर खऱ्या अर्थाने  ताजं वाटतं.

       आता तिने राहिलेल्या खोल्या पुसून घेतल्या..टेबल पुसून घेतला. खिडकीच्या काचा पुसून ती उघडली...घरातल्या झरोक्यांबरोबर आजींसोबतच्या संवादाचा झरोकाही आज उघडला होता. आता कुठे तिला फ्रेश - फ्रेश वाटलं. एकदा घरात सगळीकडे नजर फिरवत स्वतःवर जाम खूश होतं तिनं वेणी हवेत उडवली. बाहेरच्या झाडाची फूलं आणून टेबलवर मांडत लॉगिन केलं. डेली मीटिंग मध्ये तिचा बॉस " importance of effective communication with clients" बद्दल बोलत होता. मान डोलावत ती हसली.

-©अमिता 

Note : झरोका = खिडकी 

Picture Credit - google +  Two Women at a Window (1665-1675) by Bartolomé Esteban Murillo

(about 2nd pic- ही सुंदर कलाकृती (खिडकीत बसलेल्या २ स्त्रिया )Bartolomé Esteban Murillo या  स्पॅनिश चित्रकाराची आहे. ☺

 

Friday, 5 January 2024

     


     घराजवळच्या मंदिरातला घंटानाद, देवघरात तेवणारी वात, घराच्या पायर्‍या चढउतार करतानाची लय..गिरणी, बाजार, नेहमीचं किराणा दुकान, ड्रेस अल्टर करून देणाऱ्या काकू, रोज स्वतःशी केलेली कामांची यादी, माझा परिसर, माझे लोक.. अंगणातली तुळस, कुंडीतली फुलं,आईचा स्वर, बाबांचा वावर, आजवर चालत आलेली रोजची वाट...सारं सारं आठवत..काळजात साठवत असते सासरी जाणारी लेक.

    अशीच माणसं, अशाच गोष्टी, असेच क्षण देईल का नवी वाट? ही नवी वाट पुढ्यात असताना रोजच्या सवयीच्या वाटेवर पाऊल थबकतं ना..तेव्हा तिच्या शब्दकोशात एका शब्दाची भर होते. तो म्हणजे - ' माहेर '. काही देण्यासाठी, काही मिळवण्यासाठी, एकाच वेळी भरलेली आणि रिती ओंजळ घेऊन दोन घरांची समृद्धी इच्छिते सासरी जाणारी लेक.

#दिलसे... 

Wednesday, 12 April 2023

    


              धापा टाकतच ती बसमध्ये शिरली. बाहेर उन्हाचा वाढणारा पारा, वेळेत कामावर जायच्या घाईत जागा आहे, नाहीये याचा विचार न करता पटापट मिळेल त्या जागी बसलेली, उभी राहिलेली अनेक माणसं. घाई-घाईत अशा बसमागे धावणाऱ्या, सर्व शक्तीनिशी धावत जाऊन बस पकडणाऱ्या माणसांमध्ये मी अनेकदा स्वतःला पाहते. तो/ती कमी प्रयत्नात यशस्वी झाली तर आपसूकच बरं वाटतं.कारण अनेक वेळी मीही नेमक्या याच परिस्थितीत असते. क्वचित कधीकधी बस कंडक्टर, चालकांनी आपल्याला पळत येताना पाहून काही क्षण गाडी थांबवली किंवा वेग कमी केलाय हेही कळतं. हे gestures (या कृती) छोटे वाटत असले तरी सुखावून जातात, त्याही क्षणी चेहऱ्यावर स्माईल आणतात.

          ती आली तशी सरळ बसच्या पायऱ्यांवर बसली, मोकळा श्वास घेतला. थोड्या वेळाने उभी राहिली. तिच्यालगतच्या खांबाला टेकून मीही उभी होते. नकळत एकमेकींशी हसलो. कंडक्टर म्हणाले- " ताई..फार पळत आलीयेस तू. बस जरा. पाणी पाहिजे ?" तिने मान डोलावत नकार दिला. 

     आयुष्याचंही असंच असतं..नाही ? जगात आजवर सुखापेक्षा दुःखाने जोडलेली माणसं जास्त असावीत असं मला वाटतं. आणि कठीण परिस्थितीत कळत-नकळत ज्यांनी एकमेकांना साथ दिली, फार काही नाही तर किमान एकमेकांना ऐकून घेतलं ते बंध जास्त अतूट असतात. समदुःखी माणसं नकळत जोडली जातात. मग त्यांचा प्रवास वेगवेगळा असेल तरी ती समान परिस्थिती, ती सहवेदना, त्यांना त्या काळापुरती का होईना एकटेपणाच्या भावनेतून बाहेर काढते आणि काळ सुसह्य होतो. म्हणून तर आपण एकाच वाटेचे प्रवासी आहोत किंवा "वी आर ऑन द सेम पेज /सेम पाथ " हे वाक्य ऐकल्यावर जरा बरं वाटतं की नाही ? आणि हे शेअरिंग त्यांना आशादायी ठेवतं. या नात्यांना कित्येकदा काही नाव नसतं पण अस्तित्व मात्र असतं. आपापलं इच्छित स्थळ (डेस्टिनेशन) आल्यावर तो सहप्रवास थांबतो किंवा कुणी एकजण मागे राहिला तर तो पुन्हा एकटा होतो किंवा खूप काही शिकलेला असतो. क्वचित काही ठिकाणी हे बंध कायम जपले जातात ही सुंदर गोष्ट! व्यक्तिपरत्वे वेगळी.

                 विचारांच्या तंद्रीत माझाही थांबा आला. कानात आणि मनात मन्ना डेंचे  स्वर अजून घोळत होते- 

"फिर कही कोई फूल खिला

चाहत ना कहो उसको...

फिर कही कोई दीप जला

मंजिल ना कहो उसको...

फिर कही कोई फूल खिला..."

#DilSe...

#PMT_Diaries

-©अमिता 

(PMT - पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)

Sunday, 19 March 2023

ओझं...

    


        आपल्या डोळ्यासमोरून आपल्याला हवी असणारी बस निघून जाताना बघणं अजिबात सुखावह नसतं. १ मिनिट का होईना..मन खट्टू होतंच. परवा ऑफिसमधून घरी जाताना असंच झालं. पूर्वीच्या बसेस- ज्यांचे दरवाजे उघडे असायचे त्यात वेग कमी झाल्यास पळत जाऊन ती पकडण्याचा पर्याय असायचा. पण आमच्या मार्गात नवी इलेक्ट्रिक बस..जिचे दरवाजे बंद असतात. मग अशा वेळी गाडी सुटताना आपण ऑफिस मधून निघताना दवडलेली २-४ मिनिटं उगाच आठवत राहतात.आणि दुसऱ्या बसने अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन दिल्यास होणारी चिडचिड विचारायलाच नको. पण कानात गुणगुणणारे किशोरदा, रफीसाहेब,लतादीदी किंवा इतर अनेक कलाकार हा त्रागा सुसह्य करतात.असो :) 

     त्यानंतरचा दुसरा दिवस- ऑफिसचं काम संपवून आज मी वेळेत घरी जायला निघाले. बसस्टॉपच्या दिशेने झपझप चालणाऱ्या पावलांना एका काकूंनी मध्येच येऊन ब्रेक लावला आणि मला  विचारलं - "तुम्ही कुठे काम करता ?" मी ऑफिसच्या इमारतीकडे बोट दाखवून उत्तर दिलं. "घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी लहान मुलांना सांभाळायचं काम  मिळेल का ? कुणाला तशी गरज असेल तर मला सांगा. मी काम शोधतेय " त्यांनी एका दमात सांगून टाकलं.  " सध्या कुठे काम करता तुम्ही ?" मी विचारलं. "याच भागात राहते आणि इथल्याच काही घरांत धुणी-भांडी. पण खूप वर्षांपासून करतेय आणि आता तब्येत साथ देत नाही, म्हणून थोडं कमी धावपळीचं काम बघतेय, एखादं लहान मूल व्यवस्थित सांभाळू शकते." त्या म्हणाल्या. "मी या परिसरात राहत नाही. माझ्या घरी तर नाही पण ओळखीच्या कुणाला गरज असेल तर नक्की सांगेन." असं सांगून मी इतर काही पर्याय सुचवले. 

       बोलता बोलता त्यांनी सांगितलं - त्या सोलापूरच्या आहेत. घरी कोण कोण असतं विचारलं तर म्हणाल्या "मी आणि माझी मुलं -एक मुलगा आणि मुलगी." "आणि त्यांचे वडील ?" "त्याचं काय ? त्याला काही पडलेली नाही आमची.तो काय..असून नसून सारखाच. बेवडा आहे ओ.. लग्न झाल्यावर काही महिने धड राहिल्याचं आठवत नाही. तेव्हापासनं मीच ओढतेय गं. थकले आता आणि तेच तेच काम करून नको नको झालंय. पाठदुखी, कंबरदुखी सगळं मागं लागलं , म्हणून मी शोधायला लागलेय वेगळं काम." मुलांच्या बापाला दोन शिव्या घालून न राहवून त्या बोलल्या. आपल्या अस्तित्वाची आपल्या जोडीदाराला जाणीव नसणं, लग्न करताना आपल्या जोडीदाराला कायम साथ देऊ, बायकोची जबाबदारी घेऊ ही घेतलेली वचनं रोज मोडताना पाहणं याचं दुःख काय असतं हे त्यातून गेलेल्या स्त्रियांनाच माहीत. व्यसनापायी पांगळे झालेले असे कित्येक संसार पाहिले आजवर. चांगल्या माणसांची मती आणि कॉमन सेन्स हलवणाऱ्या 'दारू' या  गोष्टीचा मला यामुळेच तिरस्कार आहे ,अगदी लहानपणापासून. अशा अनेक निरुद्योगी माणसांच्या संसाराचा गाडा एकहाती ओढलाय अनेक माऊल्यांनी..केवळ आपल्या मुलांसाठी. का कुणास ठाऊक...लग्नासाठी स्थळांना भेटताना सांगाव्या लागणाऱ्या अपेक्षांमध्ये 'निर्व्यसनी माणूस' ही अपेक्षा सांगितल्यावर कपाळावर आठ्या आणणारे, क्वचित हसणारे, किंवा २०२३ मध्ये हा काय मागासलेपणा असं सुचवणारे काही चेहरे मला आठवले.

       काही वेळ त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. "काय शिकलीस गं तू? आणि कधीपासून काम करते?" "इंजिनिअरिंगची पदवी घेतली नंतर जॉब."  म्हणत मी माझ्याविषयी थोडं सांगितलं. इतका वेळ मला न्याहाळत असताना त्यांना आपली मुलगी दिसत होती हे कळलं होतं. "माझी मुलगी हुशार आणि मेहनती आहे गं. तिलाही लागेल ना नोकरी ? " मी उत्तरले - "का नाही ? तुम्ही शिकवा तिला, किमान पदवीधर करा. कितवीत आहे ?" "दहावीची परीक्षा देतेय, चांगले जातायेत पेपर. शिकवायचंय मला तिला.आणि ती करणार काही ना काही, विश्वास आहे मला. " त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. पुढच्याच क्षणी चिंतेने म्हणाल्या - "खरं पोरगा लई ताप देतोय, पोरीपेक्षा मोठा आहे पण बापाच्या वळणावरच जातोय का काय असं वाटतं. शाळा सोडली आणि अजूनही त्याचा मला काही हातभार नाही."  मुलीला त्यांच्या कष्टाची जाणीव आहे हे प्रत्येक वाक्यात जाणवत होतं. परिस्थितीचे चटके एकवेळ ठीक पण त्या बरोबरच व्यसनी बापाच्या चुकांपायी होरपळून निघालेलं बालपण अनुभवलं तर त्यातून दोन टोकाची व्यक्तिमत्व घडतात. एक - लहानपणीच जबाबदारी आल्यामुळे मनाने लवकर प्रौढ आणि जबाबदार झालेली मुलं, आणि दुसरी - त्या वाईट गोष्टींमध्येच हरवून आयुष्य वाया घालणारी. "हीच वेळ आहे. त्याला नीट समजावून सांगा, गरज पडली तर खडसावून. त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या, छोटं-मोठं मिळेल ते काम प्रामाणिकपणे करू द्या पण व्यसन नका लागू देऊ." मी सांगत होते. त्यांनी होकार दिला.

       २५६...बसचा नंबर मला लांबूनच दिसला पण आमचं बोलणं संपलं नव्हतं.  "ताई, तू एखादे दिवशी माझ्या मुलीशी बोलशील ? माझा नंबर घेऊन ठेव." म्हणत त्यांनी मोबाईल नंबर ची देवाणघेवाण केली. एकमेकींचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या दिशेने वळलो. काल हुकलेली बस आज दिसूनही मी मुद्दाम सोडली होती पण तरी आज त्याचा खेद नव्हता. त्या त्या वेळी मनात असलेल्या भावना एकसारख्या परिस्थितीचेही संदर्भ बदलून टाकतात. अंधारलेल्या वाटांवर मोठ्या हिमतीनं चालणाऱ्या आणि मुलीच्या रूपात भेटलेल्या पणतीला  तेवत ठेवत प्रकाशाचं स्वप्न पाहणाऱ्या त्या आईशी बोलणं अर्धवट सोडून गेले असते तर लवकर पोचूनही टोचत राहिली असती ती गोष्ट. क्षणभर मन हलकं करून कुणाला बरं वाटत असेल तर ऐकण्यासाठी कान नक्कीच देऊ शकतो आपण. 

     जन्मभराची साथ देणाऱ्या जोडीदाराला चांगल्या सहजीवनाऐवजी फक्त त्या नात्याचं ओझं सांभाळायला भाग पाडणाऱ्या नालायक जोडीदारांसारखं कुणीच..कधीच होऊ नये. असं करून त्यांना आपसूक मिळणारा आदर आणि प्रेम ते स्वतः गमावतात. त्या काकू आणि अशा अनेकींच्या डोळ्यांतली व्यथा तमाम बेवड्यांना वाचता आली आणि कळली तर किती बरं होईल. नाही का ?

#PMT_Diaries

-©अमिता 

(PMT - पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)