Sunday, 18 February 2018



थिजून जातो  दरबार ऐकताच
"सिवाजी..जिंदा या मुर्दा..कौन ला रहा है?"
निर्वतल्यावर शत्रूही म्हणतो..
"या खुदा..तेरा नेक बंदा आ रहा है.. !"
छाटून बोटे अन्यायाची, स्वराज्य केले खडे
बेड्या सोडवण्याची ताकद दिलीस,
तेव्हा मराठी पाऊल पडते पुढे...
दौलतखान, इब्राहिमखान, जिवा महाला,
बाजीप्रभू अन तानाजी..किती करावी गिनती
माणसे कमावली ज्याने जाती-धर्माच्या तोडून भिंती..
धन्य झाल्या जिजाऊ अन धन्य झाली महाराष्ट्राची माती,
"अशीच आमुची आई असती सुंदर, तर आम्हीही झालो असतो सुंदर"
वदले जेव्हा शिवछत्रपती...!
नावाने ज्याच्या चैतन्याचा झरा सळसळतो
गड आला तरी सिंहासाठी..राजा आपुला हळहळतो..
वाघाच्या या काळजाने..माउलीसम जपली प्रजा..
कणखर सह्याद्रीही लवून म्हणतो..
जय जय शिवाजीराजा...!
जय जय शिवाजीराजा...!!!
                                                                                                 -अमिता

                                                                                                 sketch by- नम्रता पाटील (Thank u!)
पराक्रमी माणूस संवेदनशील असला आणि राजा असा असला तर काय होऊ  शकतं याचे मूर्तिमंत आदर्श  उदाहरण म्हणजे -महाराष्ट्रच्या अन भारताच्या शिरपेचात दैवाने खोचलेला मानाचा तुरा , किंबहुना तो शिरपेचच -जिजाऊंचे, मावळ्यांचे शिवबा , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते -छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..विनम्र अभिवादन!
 

Tuesday, 13 February 2018

साथ...


  



   मूळ रांगोळीत नसलेले जास्तीचे ठिपके मांडून तिनं रांगोळी पूर्ण केली. "किती  ते किती  ठिपक्यांची आहे हो ही रांगोळी ?" हा तिला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न..समोरच्याला सहजासहजी ठिपक्यांच्या गणिताचा अंदाज येऊ नये इतकी सुरेख अन परफेक्ट रेखाटलेली रांगोळी..कधीकधी ती अजून सुरेख करण्यासाठी लागणारे ठिपके वाढवून ती पूर्ण केलेली..संसाराचंही असंच असतं.., नाही ? जगाला अंदाज लागू देता सगळे ठिपके काळजीपूर्वक जोडत जोडत रेखत जायचे असतात..कधीकधी तडजोडीचे (adjustment चे) ज्यादा ठिपके देऊन ती सुरेख करत जायची  असते. जमतं सगळं..फक्त रेखाटणाऱ्या दोन बोटांची साथ घट्ट असली पाहिजे..त्यांची आठवण येऊन ती स्वतःशीच हसली..

       तीस वर्षांचा संसार..असाच तर करत आलो आजवर..नोकरी करणारा जावई मिळाला म्हणून आईवडिलांनी आनंदानं पाठवणी केली होती..खेड्यातून शहरात..जेमतेम मॅट्रिकच्या शिक्षणाने दिलेला आत्मविश्वास घेऊन, एकेक गोष्ट शिकत, पतीच्या मोजक्या पगारात काटकसरीनं सगळं केलं. शहरात आलेला मध्यमवर्गीय माणूस गावापासून दूर असला तरी घरच्यांसाठी खूप काही करत असतो..त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षांमध्येही फार हौसमौज, चैन करता आली नाही. पण तरीही सुंदर होते ते दिवस..अगदी कधीतरीच सोबत पाहिलेला सिनेमा, कधी घरीच दोघांनी किंवा त्याकाळी अक्ख्या कॉलनीसोबत पाहिलेल्या टीव्ही.मालिका, बोलताही खूप काही बोलून जाणारा- दोघांनाही भिजवणारा- एकच पाऊस, काडी-काडी जोडून घरटं बांधावं तशी एकेक वस्तू जोडून थाटलेलं छोटं घर.नंतर सगळी स्वप्न मुलांच्याच डोळ्यात पाहिली. आता नातवाला खेळवताना मुलांच्या  लहानपणीच्या  आठवणींत रमून जातो दोघेही.लग्नानंतर सुरुवातीला वाटणारं शारीरिक आकर्षण, नंतर मुलं-बाळं..फक्त एवढंच नसतं ना आयुष्यात जोडीदाराचं महत्व..?भावनिक गरजाही महत्वाच्या अन दीर्घकालीन असतात. आपल्याला समजून घेणारा जोडीदार , आपली सुख-दुःखं, स्वप्नं आणि मनातलं सगळं ज्याच्यासोबत वाटून घेता येईल अशी साथ खरंच हा प्रवास समाधानी बनवतात .प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदारात असा पार्टनर..असा मित्र/मैत्रीण  शोधत असते.

      आयुष्य आणि अडचणी यांचं जवळचं नातं आहे, किंबहुना या समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वीची गोष्ट..माहेरी मदतीसाठी स्वतःचा दागिना देताना खरंतर खूप घाबरून, संकोचून गेले होते मी.पण यांनी एका शब्दानेही विचारता संमती दिली होती. एकवेळ मी दादाकडे तो परत मिळवण्यासाठी तगादा लावला असेल पण ही गोष्ट अगदी भांडणातही बोलले नाहीत चुकूनही..आई-बाबा (सासू-सासरे) होते तोवर त्यांनाही आवडायचा आणि यांनाही  आवडतो माझ्या हातचा स्वयंपाक. पण त्यातही हे नको, ते नको..असं करता केलेलं सगळं आवडीनं खातात. कधीकधी माझ्या सूचनांनी वैतागले तरी त्या पाळतातही. मतभेद होतच नाही असं नाही..पण लोणच्यासारखं मुरलेलं नातं त्यातूनही मार्ग काढतंच.समोर काही बोलणार नाहीत पण कधीतरी धाकटा लेक सांगत होता- "पप्पा कुणालातरी सांगत होते..आमची 'ही' आणि मुलं यांनी फार काही  मागितलंच नाही माझ्याकडून..समजूतदार आपली माणसं मिळणं हेही भाग्यच!" आता मुलं म्हणतात- दोघांनी हि इंनिंगही  उत्साहानं जगा..राहिलेल्या, मिस केलेल्या गोष्टी, जागा पहा. तेव्हा खरंच भरून पावल्यासारखं वाटतं.

   घरात येऊन तिनं चालू असलेला पंखा बंद केला. गरज नसताना पंखे,दिवे बंद करण्याच्या वीजबचतीच्या त्यांच्या सूचना ते घरी नसताना जास्त लक्षात येतात. एरवी त्यांचंच जास्त लक्ष असतं त्याकडे.आज आपण समाजात पाहतो की पत्त्यांचं घर कोसळावं तसं प्रेमानं उभे केलेले काही संसार आकर्षणाची चमक संपल्यावर कोलमडतात..तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ समजण्यात आपण कमी पडतोय का ? असं वाटतं. प्रेमाच्या आणाभाका खूप उत्साहानं घेणं सहज शक्य आहे..पण ते निभावताना लागणारा विश्वास, आदर आणि व्यक्त करताही नंदादीपासारखं अखंड तेवत असणारं प्रेम ..हे आपल्या आईबाबांच्या पिढीतल्या बऱ्याच जोडप्यांकडे पाहिलं की लक्षात येतं. आणि ते शिकण्यासारखं आहे . अर्थात प्रेम व्यक्त करणंही महत्वाचं आहे आणि जरूर करावं पण त्या व्यक्तीला त्याचे गुणदोष, त्याची माणसं या सर्वांसोबत स्वीकारून एकमेकांची साथ निभावण्याची ही प्रेमाची भाषा नितांत सुंदर आणि आवश्यक आहे असं वाटतं.

       दरवाजाची बेल वाजताच तिनं दरवाजा उघडला. बऱ्याच दिवसांनी समोर त्यांना पाहून तिचा चेहरा उजळला. "आज पिठलं-भाकरीचा बेत कर..तोंडाची चव बिघडलीय" फर्माईश आली. "आणि.. हे धर" गुलाबाचं फूल हाती सोपवत ते म्हणाले. "हे काय नवीन ?"  "अगं, खूप आलेत बाजारात..valentine day  की काय आहे म्हणे..छान वाटला म्हणून घेतला गुलाब..तुला आवडतो ना..?"

"हम्म..छान आहे..फुलदाणीत ठेवते" म्हणून ती पिठलं-भाकरीच्या तयारीला लागली.

#आयुष्याच्या_चढ_उतारांमध्ये_वर्षानुवर्षे_सदैव_एकमेकांना_साथ_देणाऱ्या_सर्व_सदाबहार_जोडप्यांना_समर्पित!!!
#DedicatedTo_All_EvergreenCouples_who_Have_been_StandingWith_EachOther_Since_Years&Years_throughout_Ups&Downs_Of_Life!!!

                                                                            (संकल्पना- विशाल पाटील )
                                                                            विस्तार व शब्दांकन- अमिता अशोक पाटील.