Saturday, 6 February 2016

वाटसरू

                               

काट्यांची वाट तरीही
अंतरी फुलांची रास
मन चातक वेडा त्याला
भर उन्हात सरींची आस  
        इच्छा कधी पूर्तीस मुकते
    कधी हवी ती गाडी चुकते
    आसवे जरी डोळ्यांत
    मन भिजून चिंब होते
कधी वादळात नाव
कधी शब्दांचे ते घाव
वेचून निखारे सारे
जागल्या मशाल पेटवतो
        सोडून सावल्या जाती
        संगे काळोख्या राती
        उधळून जिवाची भीती
        तो पुढे पुढे चालतो
दोस्ती करता काट्यांशी
नकळत फुले उमलली
भेटते कुण्या वळणावर
गाडी ती चुकलेली
      फिरुनी पुन्हा तो तेव्हा
      दिवस जुने आठवतो
      आसवे 'ही' अन 'ती'ही
      शिंपल्यात साठवतो
जन्म देवूनी दाता
अनुभवांनी झोळी भरतो
चालता चालता मग इथे
वाटसरू वाटाड्या होतो 

  अन मशाल विश्वासाने  हातात कुण्या सोपवतो ....

  वेचून निखारे सारे , जागल्या मशाल पेटवतो..


 

 


No comments:

Post a Comment